विजय शिंदे
महायुतीने सत्ता स्थापन केल्यानंतर जवळपास तीन महिने पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. अखेर शनिवारी (दि.18) प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची यादी राज्य सरकराने जाहीर केली.
मात्र, यादी जाहीर करताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय. एका दिवसात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांचं पालकमंत्रिपद गेलं
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद रिक्त राहणार आहे. मंत्री भरत गोगावले रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना पदापासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत राजीनामे दिले होते. दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्रिपदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु होती. त्यानंतर दोन जिल्ह्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
राज्य सरकारने आदेशात काय म्हटलंय?
संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री/सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. उक्त शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या “नाशिक” आणि “रायगड” या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत, याद्वारे, स्थगिती देण्यात येत आहे.
3. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११९२०५३२५५७०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.